रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

पाण्याचे अभंग

अभंग पाण्याचे .... प्रल्हाद दुधाळ

पाण्याचे महत्व,जाण रे माणसा,
असा रे तू कसा,हलगर्जी.

नको ओतू अशी,भरलेली भांडी
उगाच का सांडी,जाते वाया.

होत नाही शिळे,पाणी हे जीवन
साफ ठेव मन,पाण्या प्रती.

मुबलक येथे,दिसतसे तुला,
महाग थेंबाला,किती लोक.

घोटातला घोट,द्यावा तहानेल्या,
किती पिढ्या गेल्या,शिकवून.

पुनर्वापराची,व्हावी चळवळ,
प्रत्येकाने बळ, द्यावे त्याला.

पावसाचे पाणी,साठवण व्हावी,
त्यायोगे टंचाई, दूर व्हावी.

जगण्यास जीवा,आवश्यक पाणी,
जाण ती कहाणी,जलाची या.

मुबलक साठा,कोण एक काळ,
नद्या नी ओहोळ,तुडूंब ते.

नाही उमजले,महत्व पाण्याचे,
नासले तयाचे,स्रोत सारे.

कसा कुठे गेला,अनमोल साठा,
आता का हो तोटा,जाणवतो.

माणसाने केला,जंगल विनाश,
आवळला फास,स्वगळ्याशी.

ढळला तो तोल,वाढे प्रदूषण,
कशाला दुषण,पर्जन्याला.

जाणला ना वेळी,महीमा पाण्याचा,
धोका दुष्काळाचा,डोईवरी.

होते मुबलक,पाण्याचे तलाव,
लावले लिलाव,अंगी आले.

जनावरे धुती,प्यायच्या पाण्यात,
केला उतमात,अपव्यय.

काही शहरांत, पाण्याची ही चांदी,
कुठे अनागोंदी,कायम ती.

तोंड धुण्यासाठी,धो धो वाहे नळ,
मुक्त चाले खेळ,पाणी पाणी.

पावसाचे पाणी,सर्व जाते वाया,
त्यास साठवाया,करा काही.

धरणात साठे,हल्ली कमी झाले,
गाळाने भरले,पात्र त्याचे.

पाणी वाचवण्या,आता करा घाई,
अमर्याद नाही,जीवन हे.

आता हो रे जागा, कर जागरण,
पाण्यासाठी जन,एकत्र या.

हीच विनवणी,वाचवा हो पाणी
मंत्र ध्यानीमनी,पाण्याचाच.
     .... प्रल्हाद दुधाळ . पुणे.
              ९४२३०१२०२० .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा